पानपताचा फटका



(चाल: भल्या माणसा, दसलाखाची.)
कौरव -पांडव-संगर-तांडव द्वापर-काली होय अती 
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपती ॥ धृ.॥

जासुद आला कथी पुण्याला - ''शिंदा दत्ताजी पडला;
कुतुबशहानें शिर चरणानें उडवुनि तो अपमानियला ।''
भारतवीरा वृत्त ऐकतां कोप अनावर येत महा
रागें भाऊ बोले, ''जाऊ हिंदुस्थाना, नीट पहा.
'काळा' शी घनयुध्द करुं मग अबदल्लीची काय कथा ?
दत्ताजीचा सूड न घेतां जन्म आमुचा खरा वृथा.''
बोले नाना, ''युक्ती नाना करुनी यवना ठार करा;
शिंद्यांचा अपमान नसे हा; असे मराठया बोला खरा.''
उद्गीरचा वीर निघाला; घाला हिंदुस्थानाला;
जमाव झाला; तुंबळ भरला सेनासागर त्या काळा.
तीन लक्ष दळ भय कराया यवनाधीशा चालतसे;
वृध्द बाल ते केवळ उरले तरुण निघाले वीररसें.
होळकराचे भाले साचे, जनकोजीचे वीर गडी,
गायकवाडी वीर अघाडी एकावरती एक कडी.
समशेराची समशेर न ती म्यानामध्यें धीर धरी;
महादजीची बिजली साची बिजलीवरती ताण करी.
निघे भोसले पवार चाले बुंदेल्यांची त्वरा खरी;
धीर गारदी न करी गरदी नीटनेटकी चाल करी.
मेहेंदळे अति जळी अंतरी विंचुरकरही त्याचपरी;
नारोशंकर, सखाराम हरि, सूड घ्यावया अशी धरी.
अन्य वीर हे किती निघाले गणना त्यांची कशी करा ?
जितका हिंदू तितका जाई धीर उरेना जरा नरां.
भाऊ सेनापती चालती विश्वासातें घेति सवें,
सूड ! सूड !! मनिं सूड दिसे त्या सूडासाठी जाति जवें.
वीररसाची दीप्ती साची वीरमुखांवर तदा दिसे;
या राष्ट्राचे स्वातंत्र्याचे दृढस्तंभ ते निघति असे. 
वानर राक्षस पूर्वी लढले जसे सुवेलाद्रीवरती
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपती ॥ कौ. १ ॥

(२)

जमले यापरि पानपतावरि- राष्ट्रसभा जणुं दुसरि दिसे; 
वीर वीरमदयुक्त सभासद सेनानायक प्रतिनिधिसें.
अध्यक्ष नेमिले दक्ष भाउ अरि भक्ष कराया तक्षकसे;
प्रतिपक्षखंडना स्वममंडना; तंबू ठोकिती मंडपसे.
शस्त्रशब्द हीं सुरस भाषणें सभेंत करिती आवेशें;
रणभूमीचा कागद पसरुनि ठराव लिहिती रक्तरसें.
एका कार्या जमति सभा या, कृति दोघींची भिन्न किती !
बघतां नयनीं वाहतीलची पूर अश्रूंचे स्वैरमति
पूर्ववीरबल करांत राहे, आहे सांप्रत मुखामधी;
हाय ! तयांचे वंशज साचे असुनी झालों असे कुधी !
जमले यापरि पानपतावरि भारतसुंदरिपुत्र गुणी 
युध्द कराया, रिपु शिक्षाया, संरक्षाया यशा रणी ॥ कौ. ॥२॥

(३)

अडदांड यवन रणमंडपिं जमले; युध्दकांड येथोनि सुरु.
करिती निश्चय उभयवीर रणधीर '' मारुं वा रणीं मरुं''
पुढें पडे दुष्काळ चमूंमधि अन्न व खाया वीरांना;
म्हणती, ''अन्नावांचुनि मरण्यापेक्षा जाऊं चला रणा.''
मग सेनेनें एक दिलानें निश्चय केला लढण्याचा;
स्वस्थ होळकर मात्र नीचतर पगडभाई तो यवनांचा.
परधान्यहरणमिष करुनि रणांगणि पढले आधीं बुंदेले;
श्रीशिवराया युध्द पहाया हांक द्यावया कीं गेले ?
धन्य मराठे ! धन्य यवन ते रणांगणांमधिं लढणारे !
आम्ही त्यांचे वंशज केवळ हक्कांसाठी रडणारे 
आवेश प्रवेशे दोन्ही सैन्यामधें कराया युध्दखळी;
परि स्वार्थ अनिवार मार दे, आर्यजनांमधि करि दुफळी.
आर्यजनांचें दैवहि नाचे अभिमानाचें रुप धरी;
करि वसति मनिं सदाशिवाच्या; होय अमुच्या उरा सुरी.
सुरासुरी जणुं डाव मांडिला बुध्दिबळाचा भूमिवरी;
परि दुर्दैवें वेळ साधिली प्यादीं आलीं अम्हांवरी !
कलह माजला, झालि यादवी, नवीन संकट ओढवले;
कारस्थानीं हिंदुस्थाना व्यापुनि पूर्णचि नागविले .
कुणि यवनांचा बाप जाहला, ताप तयाचा हरावया,
नवा सोडुनी जया दवडुनी कुणीं लाविल डाग वया.
कुणि दिल्लीची वाहि काळजी, कोणी तख्तासाठिं झुरे;
कुणा लागला ध्यास प्रीतिचा विचार सारासारिं नुरे.
''लालन लालन !'' करि कुणि, साधी मर्जीनेची कुणि मरजी;
असे घसरले, साफ विसरले युध्दरीती अति खडतर जी.
गारदीच मज माफ रुचे जरि यवन न सोडी विश्वासा;
निजबंधूंची करणी ऐकूनि सोडिं, वाचका, नि:श्वासा !
कलहा करिती काय विसरती क्षुद्र वस्तुच्या अभिमानें,
जसे हल्लिंचे लोक तोकसम कलहा करिती नेमानें,
नेमानेमाच्या या गोष्टी कष्टी होतें मन श्रवणीं
असो; बुडाली एकी, बेकी राज्य चालवी वीरगणीं
सरदारांच्या बुध्दिमंदिरा आग लागी कलहाची 
शिपाइभाई परि नच चळले; रीति सोडिली न मर्दाची.
नाहीं लढले, लढणारहि नच कुणी पुनरपि या जगती;
तसे मराठे गिलचे मोठे कलिंत लढले पानपती ॥ कौ. ॥३॥

(४)

एके दिवशी रवि अस्ताशी जातां झाला विचार हा -
'' प्रात:काली स्मरुनी काली युध्द करुं धनदाट महा.''
निरोप गेला बदशहाला, '' युध्द कराया उद्यां चला;
समरांत मरा वा कीर्ति वरा जय मिळवुनि आम्हांवरि अचला.''
सकल यामिन आर्यवाहिनी करी तयारी लढण्याची;
वीरश्रीचा कळस जाहला परवा न कुणा मरणाची .
परस्परांतें धीर मराठे गोष्टि सांगती युध्दांच्या ,
वीरश्रीच्या शस्त्रकलेच्या जयाजयांच्या अश्वांच्या.
बोले कोणी, '' माझा न गणी वंशचि मृत्यूभयासिं कधी;
आजा, पपजा, बापहि माझा पडला मेला रणामधीं.
बापसवाई बेटा होई खोटा होइल नेम कसा?
पोटासाठी लढाइ नच परि मान मिळविण्या हवा तसा !''
कुणी धरी तलवार करीं तिस पाहुनि आनंदें डोले,
फिरवी गरगर करि खालीं वर वीर मराठा मग बोले -
''अफाट वाढीची ही बेटी मोठी झाली लग्नाला
प्राणधनाचें द्याज घेउनी उद्यांच देइन यवनाला.''
अशी चालली गडबड सगळी निद्रा कोण नच आली;
कोठें गेली अशी पळाली रात्र न कोणाला कळली.
प्रभातरुपें ईर्षा आली; भीति पळाली निशामिषें;
भय मरणाचे कैचें त्यांना? काय करावें हरा विषे ?
शिंग वाजलें संगरसूचक कूच कराया मिळे मुभा;
धांवति नरवर समरभूमिवर; राहे धनगर दूर उभा
हटवायातें देशदरिद्रा मुखा हरिद्रा लावुनिया,
कीर्तिवधूतते जाति वराया समरमंडपीं धांवुनिया.
शहावलीचा हलीसारखा अताइ नामा पुत्र बली
यवनदलीं मुख्यत्व घेत कीं पापावलिमधिं जसा कली,
प्रणव जसा वेदांस सदाशिव तसा आर्यबलसेनानी;
विश्वासातें पाहुनि वदनीं अंगुलि घातलि यवनांनी.
आले यापरि रणभूमीवरि; जसे जात कवि यापुढतीं
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपतीं ॥ कौ. ॥४॥

(५)

वाढे जैसा दिवस, वाढलें युध्द तसें अतिनिकरानें
हातघाइला लढाइ आली; अंबर भरलें नादानें.
उभय वीरवर गर्जति 'हरहर', 'अल्ला अकबर' उल्हासें;
भासे आला प्रळय; यमाला दिली मोकळिक जगदीशें.
अश्ववीरगज भक्तमंडळी गोंधळ भारतदेवीचा;
तलवारींच्या दिवटया केल्या; सडा घातला रक्ताचा.
धूळ उडाली गुलाल झाली; ''उदे'' गर्जती भक्तबळी,
परस्परांचे बळी अर्पिती भूमि तर्पिती शिरकमळी,
रणवाद्य भंयकर भराड वाजे शुध्द न कोणी देहाची;
रणमदमदिरामत्त जाहले, हले फणाही शेषाची.
मनुजेंद्रयरा जणुं अंत न उरला देवेंद्राची नच परवा
म्हणुनि धूलिकण नभीं धाडुनी मेघसंघ कीं रचिति नवा ? 
रक्तपाट अतिदाट वाहती घाट बांधिले अस्थीचे;
मृतगजतुरंग मकर खेळती कृत्य अगाधचि वीरांचें.
घोर कर्म हें बघुनी वाटे रविहि धरी निजसदनपथा;
कांपे थरथर स्थीर न क्षणभर; इतरांची मग काय कथा !
यापरि चाले लढाइ; भ्याले दाढीवाले, मग हटले;
पळती, धांवति सैरावैरा; आर्यवीर त्यांवरि उठले.
आर्यजनां आवेश नावरे; भरे कांपरें यवनाला;
म्हणति '' मिळला जय हिंदूला लढाइ आली अंताला !''
तोंच अताई दूरदृष्टिचा धीर देत निजसैन्याला,
स्वयें धांवला, पुढें जाहला, स्फूर्ति पुन्हां ये यवनाला.
त्वरित पूर्ववत् समर चाललें, हले भरंवसा विजयाचा;
दाढी शेंडी एक जाहली खेळ शहाच्या दैवाचा.
करी अताई जबर लढाई नाहीं उपमा शौर्याला;
त्यावरि ये विश्वास, भासलें कीं खानाचा यम आला !
विश्वासानें अतिअवसानें खान पाडिला भूमिवरी
करिवरचरणीं मरण तया ये, शरश एक मग यमनगरी,
धीर सोडिती पीर शहाचे पळती आवरती न कुणा;
शहावलीची कमाल झाली यत्न तयाचा पडे उणा.
पहात होता शहा खेळ हा दुरुनी, तोही घाबरला,
म्हणे, ''करावें काय? न ठावें !'' दैव हात दे परि त्याला.
दक्ष वीर लक्षैकधीर तनुरक्षक सेनेसह धावे;
म्हणे चमूला, ''पळति यवन ये कंठ तयांचे छेदावे.''
पुन्हा उलटले यवन लढाया हुकुम ऐकतां छेदावे.''
शहा तयातें सहाय होतां मारा करितो जोराचा.
जसे लढावे वीर संगरीं कविज्ञन इच्छा मनिं करिती,
तसे मराठे गिलचे याचे कलींत लढलें पानपती ॥ कौ. ॥५॥

(६)

नभोमध्यगत सूर्य होत मग युध्दहि आलें मध्याला;
हाय ! हाय ! या आर्यभूमिचा भाग्यसूर्य तो शेवटला !
सदा अम्हांला विजय मिळावा, प्रताप गावा जगतानें !
सदाशिवाचा उजवा बाहू राहु रिपुस्त्रीमुखविधुचा,
बाऊ केवळ म्लेंच्छजनांचा, भाऊ माधवरायाचा,
बेटा ब्राह्मण बादशहाचा; पेटा साचा वाघाचा,
वीरफुलांतील गुलाबगोटा, वाली मोठा धर्माचा,
ताण जयाची द्रौणीवर उद्राण आणितां आर्याला,
विजयाचा विश्वास असा विश्वास - लागला शर  त्याला !
मर्म हाणि तो वर्मी लागे कर्म आमुचें ओढवलें;
धर्म-सभेला आत्मा गेला, धर्मवधूकरिं शव पडलें.
अश्रू नयनीं आणि लक्ष्मी प्रिय भार्या त्या आर्याची;
उत्तरे चर्या, अघा न मर्या, परि ये स्मृति तिस कार्याची.
करी विचारा वीराचारा दारा वीराची स्वमनीं -
'' नाथघात सैन्यांत समजतां धीर उरेल न आर्यजनीं. ''
छातीचा करि कोट, लोटिला दु:खलोट अनिवार जरी,
नीट बैसवी प्रेता देवी धुनष्य त्याच्या दिलें करी.
धन्य सती ती ! धन्य तिचा पति ! धन्यचि जननीजनकाला !
धन्य कवीचें भाग्य असे या म्हणुनि मिळे हें गायाला !
परि जें घडलें लपले कुठलें? वेग फार दुर्वार्तेला;
अल्पचि काळें भाउस कळलें - '' गिळिलें काळानें बाळा !''
'' हाय लाडक्या ! काय कृत्य हें ? घाय काय हा भान करी
गोंडस बाळा, तोंड पुण्याला दावुं कसें ? कथिं तोड तरी, ''
असा करी ती शोक ऐकुनी दु:ख जाहलें सकळांला
अश्वावरती स्वार जाहला भाऊराया मरण्याला.
व्यंग समजतां भंग कराया आर्याच्या चतुरंग बळा
सिध्द जाहला शहा; तयाला देवानें आधार दिला.
फिरति मराठे आला वाटे अंत शिवाजीराज्याला;
भाऊराया योजि उपाया - तोही वायां परि गेला.
मान सोडिला, साम जोडिला; दूत धाडिला होळकरा;
प्रसंग येता मत किंकरा धनी जोडिती असे करां. 
दूर निघाला. सत्वर आला, होळकरांला नमन करी;
म्हणे, '' भाउचा निरोप एका - 'साह्य करा या समयिं तरी.
उणें बोललों, प्रमत्त झालों, बहु अपराधी मी काका;
माफ करा, मन साफ करा, या आफतींत मज नच टाका.
मत्प्राणाची नाही परवा बरवा समरी मृत्यु हवा;
परी लागतो डाग यशाला शिवरायाच्या तो दुरवा.
देशकार्य हें व्यक्तीचें नच; सक्ति नको; भक्तीच हवी;
आसक्ती सर्वांची असतां मिळवूं आतां कीर्ति नवी.
राग नका धरु; आग लागते यशा; भाग हा सर्वांचा;
शब्द मुलाचा धरितां कैचा? हाच मान का काकाचा ?
साह्य कराया यवन बधाया धीर द्यावया या काका !''
असें विनविलें, हात जोडिले, दया न आली परि काका.
रट्टा दे भूमातेला; धरि कट्टा वैरी मान तिची
बट्टा लावी वयास; केली थट्टा ऐशा विनतीची;
दु:खावरतीं डाग द्यायला करी होळकर हुकूम दळा -
''पळा, मिळाला जय यवनाला!'' काय म्हणावें अशा खळा ?
फिरले भाले-भाले कैचे ? दैवचि फिरलें आर्यांचें;
पाहे भाऊ, वाहे नयनीं नीर; करपलें मन त्याचें.
निरोप धाडी पुन्हा तयाला - ''पळा वांचवा प्राण तरी
पळतांना परि कुटुंबकबिला न्यावा आमुचा सवें घरीं ''
घेत होळकर वीरवधूंतें; मग दक्षिणची वाट धरी;
देशहितांची करुनी होळी नाम होळकर सार्थ करी !
करी दुजा विश्वासघात हा; निजबंधूंच्या दे साची 
परवशतेची माथीं मोळी, हातीं झोळी भिक्षेची !
काय कथावी युध्द-कथा ? मग वृथा भाउचा श्रम झाला;
धीर सोडुनी पळति मराठे, पूर्ण पराभव त्यां आला.
कोणी वेणीमाधव धांवे; वार तयाचा शिरीं जडे;
भारतरमणीकंठतन्मणी धरतीवरतीं झणी पडे.
भूदेवीची तुटे गळसरी ! फुटे दैव कीं आर्यांचे
आकाशाची कुऱ्हाड पडली; कडे लोटले दु:खाचे !
सैरावैरा आर्य धावती; हरहर ! कोणी नच त्राता !
यवन करिति ज्या मग प्रळय भयंकर: वदा कशाला तो आतां ?
वर्णन करितां ज्या रीतीनें कुंठित होइल सुकविमति,
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपतीं ॥ कौ. ॥ ॥६॥

(७)

सन सतराशें एकसष्ट अतिनष्ट वर्ष या देशाला
हर्ष मरे, उत्कर्ष उरेना; सकळां आली प्रेतकळा.
फुटे बांगडी दीड लाख ती; राख जहाली तरुणांची
आग पाखडी दैव अम्हांवर; मूर्ति अवतरे करुणाची .
घरोघरीं आकांत परोपरि; खरोखरीचा प्रळय दिसे;
भरोभरीं रक्ताच्या अश्रू अबला गाळिती शोकरसें.
'दोन हरवली मोति; मोहरा गेल्या सत्तावीस तशा;
रुपये खुर्दा न ये मोजितां' - वचना वदती वृध्द अशा;
धोर वृत्त हें दूतमुखानें कानीं पडलें नानाच्या;
'भाऊ भाऊ' करितां जाई भेटिस भाऊरायाच्या.
उघडा पडला देश तयातें हें नव संकट कां यावे !
दु:ख एकटें कविं न येत परि दु:खामागुनि दु:ख नवें !
धक्का बसला आर्ययशाला; तेथुनि जाई राज्य लया,
रघुनाथाचें धैर्य हरपलें, जोड उरेना हिमालया.
''नाथ ! चाललां सोडुनि अबला ! पाहूं कुणाच्या मुखाकडे ? ''
'' वाळा ! कैसा जासि लोटुनि दु:खाचे मजवरतिं कडे ? ''
जिकडे तिकडे हंबरडे यापरी परिसती जन फिरतां;
कोणिकडेही तरुण दिसेना; सेनासागर होय रिता.
उडे दरारा, पडे पसारा राज्याचा; बळ घेत रजा;
उघडें पडलें मढें हत्तिचें कोल्हे त्यावरि करिती मजा !
भलते सलते पुढें सरकले, खरे बुडाले नीच -करीं.
मालक पडतां नीट बैसले पाटावरती वारकरी.
नडे आमुची करणी आम्हां; ! खडे चारले यवनांनी;
तडे पडोनी यशपात्राला रडे सदोदित भूरमणी.
गंजीफांचा डाव संपला दिली अखेरी यवनांते
स्वातंत्र्यासह सर्वस्वातें दूर लोटिलें निज हातें.
रुमशामला धूम ठोकितां पुणें हातिचें घालविलें;
दुग्धासाठी जातां मार्गी पात्र ठेवुनी घरिं आले !
करि माधव नव उपाय पुढतीं परि ते पडती सर्व फशीं;
परिटघटी उघडिल्या एकदा बसेल कैशी पुन्हा तशी?
जसा नदीचा ओघ फिरावा पात्रीं पडतां गिरिशिखरें
पानपताच्या पर्वतपातें इतिहासाचा ओघ फिरे.
इतिहासाचें पान येथचें काळें झालें दैवबळें,
या देशावर अपमानाची स्वारी दु:खासहित वळे.
सर्वस्वाचा नाश जयाने वर्णु तयातें अतां किती ?
व्यास वर्णितां थकले यातें मग मी कोठें अल्पमति ?
जसें झगडतां त्वरित फिरावी सकल जगाची सरळ गति
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपतीं ॥ कौ. ॥७॥

(८)

जें झाले ते होउनि गेलें फळ नच रडुनी लेशभरी;
मिळे ठेंच पुढल्यास मागले होऊं शहाणे अजुनि तरी.
पुरें पुरें हे राष्ट्रविघातक परपस्परांतिल वैर अहो !
पानपताची कथा ऐकुनी बोध एवढा तरि घ्या हो !
भारतबांधव ! पहा केवढा नाश दुहीने हा झाला !
परस्परांशी कलहा करितां मरण मराठी राज्याला.
हा हिंदू, हा यवन, पारशी हा, यहुदी हा भेद असा,
नको नको हो ! एकी राहो ! सांगू आपणां किती कसा ?
एक आइचीं बाळें साचीं आपण सारे हें स्मरुनी, 
एकदिलानें एकमतानें यत्न करु तध्दितकरणीं.
कथी रडकथा निजदेशाची वाचुनि ऐसा हा फटका
लटका जाउनि कलह परस्पर लागो एकीचा चटका !
कौरवपांडव- संगरतांडव द्वापरकालीं होय अती
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपती ॥८॥

 - राम गणेश गडकरी