श्रीमंत ईश्वरी अंश धन्य तो वंश परमपुरुषार्थी।
बरोबरी तयांची कोण करील पाहतार्थी।।धृo।।
राजाधिराज महाराज, गरीब नवाज, धनी श्रीमंत।
भासती सदैव देव आमचे हेच भगवंत।।
पाषाण धातुच्या मूर्ती धरित्री वरती आहेत अनंत।
त्या पुज्य परंतु नाही प्रकट जीवंत।।
तसे नव्हेत हे तर देव, कलीमध्ये भूदेव, ब्राह्मण संत।
त्या वंशी पेशवे झाले सबळ बळीवंत।।
योग्यतेस आणिलें पंत होऊनिया कृपावंत, त्या राजांनी,
ह्या मुळेच चढती कमाल धरुनि अभिमान।।
मग बहिरोपंत सोडवुन, बिडी तोडवुन, प्रभुच्या पणज्यांनी।
पुढे प्रधानपद मिळवुन, वैरी पळवुन, मारिल्या शर्ती।।१।।
रावबाजी पुण्यामध्ये येऊन, हातावर घेऊन, निघाले शिर।
प्रारंभी पाहिले जनस्थान रघुवीर।।
नेमाड, माळवा, मुलुख, करुनी सरसुलुख, मोडिलें वीर।
मेवाडचे राजे न धरती धीर।।
गडमंडल बुंदेलखंड, डंघईत अखंड राहुन थंड, सही केले।
प्रतापे करून या जगात नाव मिळविले।।
बुडवुन या बहाद्दरास, आणिला घरास, माषुक मस्तानी।
दरवर्षी धौशा घालुन, जावे चालुन, अघाडीस मस्तानी।।
उपरांत नर्मदाकाठी, सार्थकांसाठी, मोक्षकार्यार्थी।
देह समर्पिला त्याच स्थानी या भावार्थी।।२।।
तेचि दुनियेमाजी धन्य न मानी अन्य, वंदिती स्वामी।
जीव खर्च कराया सिद्ध, धन्याच्या कामीं।।
तीन वर्षे राज्य बसवुन, मोर्चे बसवुन, सभोवते धमामी।
सुरुंगांनी पाडीला बुरुज अलगद बदामी।।
हल्ल्यात उडाले लोक, करिती किती शोक, पडुनी संग्रामी।
नऊ लक्ष बांगडी फुटली वसई मुक्कामी।।
बक्षीस दिले कडितोडे,पालख्या घोडे,वाजे चौघडे, जमीदाऱ्या।
ठाईं ठाईं दिमती भरून, आंख ठरवुन, सजविल्या सरदाऱ्या।।
परशत्रू होईना खांक वाटुनी परख, तशाच हवालदऱ्या।।
खुब केली तुम्ही तलवार नाव निशिवार म्हणून किती प्रार्थिती।
यशस्वी होता तो संवत्सर सिद्धर्थी।।३।।
बाळाजी बाजीराव प्रधान, केवळ निधान, होते प्राणी।
आणिलें पुण्यात जपानी नळाचे पाणी।।
युद्धात जिंकुनी नवाब, बसविली बाब, करुनी धुळधाणी।
त्या सालीच बंगल्यात घातली ठाणी।।
लागलेच केले कूच, स्वारी दरकुच, परतली सगळ्यांची।
लष्करात केवढा गजर,होई नित्यनजर, मोतीमणीपोवळ्यांची।।
वाटुन खिचडी रमण्यात, आनंदे पुण्यात, मोहरा पुतळ्यांची।।
खुष गेले शास्त्री पंडित, विद्यामंडीत, विप्र विद्यार्थी।
गेले कीर्त गात ते ब्राह्मण तीर्थोतीर्थी।।४।।
शत्रूस न जाती शरण, आल्या जरी मरण, न देती पाठ।
दादाही गणाया त्यांत, बाण भात्यात, भाताचे ताट।।
भलत्याच ठिकाणी घाली रिपुशी गाठ।
तिन्ही काळ निरंतर साधी, जातीने बांधी, हत्यारे आठ।।
फेडून नवस महोरास, केले लाहोरास, जिंकीती शेंडे।
अरे जपानी सहज अटकेत, पाव घटकेत, लाविले झेंडे।।
सरदार पदरचे कसे, कोणी सिंह जसे, कोणी शार्दुल गेंडे।।
पुढे चाले वीरांचा भार, घेती करभार, स्वामीकार्यार्थी।
हे पुरुष म्हणावे श्रेष्ठ बंधूंचे स्वार्थी।।५।।
भाऊसाहेब योद्धा थोर, अंगामध्ये जोर, पुरा धैर्याचा।
विश्वासरावही तो तसाच शौर्याचा।।
दोन्ही बाजुस भाला दाट, पलिटेना वाट, अशा पर्याचा।
किंचित पडेना प्रकाश वर सूर्याचा।।
दृष्टांत किती कवी भरील, काय स्तव करील, ऐश्वर्याचा।
शेवटी बिघडला बेत सर्व कार्याचा।।
कितीकांची बसली घरेंच, ते तर खरेच, ईश्वरी कृत्य।
शोकार्णवि नाना पडुन, नित्य रडरडून पडिले मृत्य।।
महादेव प्रभाकर ध्यायी, सदा गुण गायी, यथा साह्यार्थी।
श्रीमंत प्रभूंची कीर्त जशी भागीरथी।।६।।
-शाहीर प्रभाकर