तत्कालीन दुष्काळी परिस्थितीस अनुलक्षून श्रीसमर्थशिष्य उद्धवस्वामी यांनी केलेली ही रचना.
तुजवीण बहु कष्टी लोक हे फार जालें।
न पवसि जगदिशा मेघ तां काय केलें।
तिळभरी स्थळ काही अल्पही भीजविना।
पडत बिज भुमीचें पोटही रिझविना।।१।।
कलकलीत कलाली अंतरीं लोक मोठा।
गडबडीत मनाची सांडितो धैर्य ताठा।
धुक धुक बहु पोटी वाहती फार चिंता।
म्हणत चि जन कैसें अन्न मिळेल आता।।२।।
कण जरी अवनींचे खर्चले सर्व काही।
तरी मग जन पूढे येत्न योजिल काई।
चकपक सकळाची सर्व जायासी आली।
हपहप बहु लोकां तूर्त आता उदेली।।३।।
भक भक बहु वाटे देखता दीन मोठा।
तपत उन्ह उन्हाळा दिसतो फार खोटा।
गगन सकळ निळे नाडळें अभ्र कोठें।
जळधर रुसला की थोर हो पाप मोठें।।४।।
तडपड जीव जाती अश्व ते पश्वयाति।
कडकडकड खाती जीव जीवा स्वयाती।
निपटचि अवनींचे तोय आटोनी गेलें।
हरद कुप तटाकें नीर नाहीच जालें।।५।।
निपटचि जरि काहीं मेघ पूढे पडेना।
तरि बहु नृपतीच्या चालती केंवि सेना।
गजबज बहु पूरें पट्टणे होय कैसें।
कठिणचि जगदिशें मांडिलेंसेचि दिसें।।६।।
हर हर हर आतां काय कैसें करावें।
मरमरमर पूढे मांडिले काय देवें।
खर खर खर चिंता लागली लोकचित्ता।
त्वरितचि रघुनाथा वारणें लोकवेथा।।७।।
अति करुणळया तू पाहसि अंत का तु।
सकळचि जग तूं तूं होसि निष्ठूर का तूं।
म्हणविसी मज तूं तूं दीससी सर्वं तूं तूं।
सलगि वदतु आहे बोलिले हें क्षमी तूं।।८।।
त्वरितची घन वर्शी मेघ तो प्रतीवर्षी।
अचुकचि न चुकावा नेम वर्षानवर्षी।
जरुरचि मज तां कां आणिलें येचि वर्षी।
कठिणपण त्यजावें तूर्त मेघासि वर्षी।।९।।
विनवीत दीन तुझा शिव हा रामपाई।
त्वरित मज कृपेनें नीघवावें उपाई।
मग तुज करणें जें तां सुखा तें करावें।
परि मज हिण दीनासारिखें नादखावें।।१०।।
- श्रीसमर्थशिष्य उद्धवस्वामी (शिवराम)